ठाणे : ‘नवी दिल्ली येथील केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या स्वस्थ भारत यात्रेचे सायकलस्वार १० नोव्हेंबर २०१८ रोजी ठाण्यात येत असून, सकाळी ११ वाजता टिप टॉप प्लाझा येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर त्यांचे स्वागत करतील,’ अशी माहिती कोकण विभाग सहआयुक्त (अन्न व औषध प्रशासन) शिवाजी देसाई यांनी दिली.
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून जनतेत सुरक्षित, समतोल व पौष्टिक आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी ‘स्वस्थ भारत यात्रा’ ही मोहीम १६ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. या यात्रेत साडेसात हजारांहून अधिक सायकलस्वार सहभागी झाले असून, ते ‘आहारात मीठ, साखर, तेल थोडे कमी वापरा’ असा संदेश देत आहेत.
‘या यात्रेला सर्व ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. ठाण्यातही शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून यात्रेला प्रोत्साहन द्यावे व कमी खाण्याचा संदेश पोहोचवावा,’ असे आवाहन देसाई यांनी केले आहे.